ती मी आणि अनुत्तरित प्रश्न || मन हेलावून टाकणारी Love story 


          मी तसा साधासुधा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा, नाही म्हणायला शाळेत असताना सातवीच्या वर्गात शीतल नावाची मुलगी मला आवडायची , येता जाता उठता बसता ती दिसते का ? दिसली की फक्त तिच्याकडे बघणे आणी बघणे . त्यात मुलीसोबत बोलायचं म्हणलं की घाबरगुंडी उडायची. का कुणास ठाऊक? आजूबाजूचे बघतील, काय म्हणतील ? या विचाराने त्यावेळेस आणि पुढील कित्येक वर्षे अस काही जमलचं नाही. ते प्रेम (Love story)  होते का आकर्षण हा वेगळा विषय झाला.


          आठवीत आम्ही घर बदलले त्याच शहरात पण दुसर्या भागात रहायला आलो, त्यामुळे शाळाही बदलली. संपर्क तुटला. पण त्यावेळेस परत पूर्वीच्या ठिकाणी येऊन भेटाव (बघावं)  अस कधी वाटलंचं नाही. त्यानंतर फक्त मुलांची शाळा व ज्यु.काॅलेज असल्यामुळे परत काही बघण्याचे कार्यक्रम होत नव्हते तसं येता जाता आजूबाजूला होते बघण्यासारखे पण तो चेहरा नव्हता. आणि त्यावेळेस खतपाणी घालायला आज सारखे फेसबुक वगैरे काय साधा मोबाईल ही नव्हते. मी पण कुणाला आवडेल, तसं काही विशेष आकर्षक असं आपल्यात काही आहे असा विश्वासच नव्हता.


          मला आपल उगाच वाटायचं की न बोलता पण कळत असेल. पण ह्या निव्वळ गैरसमजुतीमुळे संधी गमावत आलो. खर सांगायचं तर अभ्यास आणि प्रेम याबाबत मी कधीही सीरिअस नव्हतो. काय म्हणतात ते ध्येयवेडे वगैरे. पुढे सिनिअर काॅलेज (हो तिथपर्यंत पोहचली) मध्ये मित्र आपलं उगाच "ती बघती बघ तुझ्याकडे सारखी" हे असं म्हणून चिडवायचे पण मला तिचं नाक त्याला बाक (कर्व) आहे म्हणून नव्हतं आवडत. त्यावेळेस फिगर ,मेकप आणि कपडे न बघता फक्त चेहर्याने माणसं आवडायची विशेषतः मुली.


          माझ्या शेजारच्या बाकावर बसणारी मारवाडी मुलगी फार काही वाईट नव्हती दिसायला पण तीला फक्त नोट्स हव्या असायच्या म्हणून काय संवाद व्हायचा तो व्हायचा बस. पहिले तीन लेक्चर झाल्यानंतर मी क्वचितच वर्गात असायचो. मित्रांसोबत फिरणे झालचं तर आचार्य अत्रे सभागृहात जाऊन पुस्तकाच्या प्रदर्शनात पुस्तके वाचणे अथवा बघत बसणे एवढाच काय तो टाईमपास. आणि अश्या छंदांमुळे पहिल्याच वर्षी दांडी गुल झाली. बारावी पर्यंत कधीही नापास न झालेलो मी नापास? असं म्हणून एकाच्या ओळखीने कामाला रूजू झालो. मधेच एका महापुरूषाने सांगितले की शिकून पण पैसाच कमवावा लागतो म्हणून तात्पुरता शिक्षणाचा विचार सोडून दिला एक वर्ष काम केल्यानंतर आईच्या ईच्छेखातर परत प्रवेश घेतला राहिलेले विषय सोडवले. दुसर्या वर्षात पोहचलो पण हजर रोज राहूनही पेपर काही नीट देता आले नाही. मग मात्र शिक्षणाचा विचार सोडून दिला.

ती मी आणि अनुत्तरित प्रश्न || मन हेलावून टाकणारी प्रेम कहानी
ती मी आणि अनुत्तरित प्रश्न || मन हेलावून टाकणारी प्रेम कहानी

          आर्थिक स्थिती फारशी उत्तम नसल्यामुळे वडिलांच्या रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात उतरलो. दरम्यानच्या काळात मोठ्या बंधूचे लग्न झाले. आर्थिक ओढाताणीमुळे घरात वरचेवर वादविवाद व्हायचे. अश्यातच मोठ्या भावाचे आजाराने आकस्मित निधन झाले. सर्वांसाठी हा एक मोठा धक्का होता. मोठा भाऊ होता तेव्हा मला मित्रांची कधी गरज किंवा उणीव भासली नव्हती तोच माझ्यासाठी मित्र होता. आम्ही सर्व खचून गेलो होतो. दोन महिने मी काही न करता घरातचं बसून होतो म्हणजे तसे काही करायची ईच्छा आणि शक्तीच नव्हती. वडिलांच्या परिचित वालगुडे यांनी त्यांचे शहरापासून थोड दूर अंतरावर असलेले दुकान चालवा आणि सर्व व्यवस्थित चालू लागल्यावर भाडे द्या असे सुचविले. आई आणि मी चहा व नाष्टा विकायचा व्यवसाय सुरु केला. घरच्या जबाबदारीच्या जाणीवेने प्रेम हा शब्द माझ्या शब्दकोशातून पुसटसा झाला होता.


          व्यवसाय ठीक चालू होता. आपल पण कोणीतरी असाव ,जीवापाड प्रेम करणार ,असा विचार कुठून तरी मनात शिकवायचा. एक दिवस एक सुंदर, सावळी मुलगी चहा घेण्यासाठी आली तिथून पुढे तिच येणार जाण चालू होत. माझी आई बडबडी असल्याने तिची आणी त्या मुलीची बर्यापैकी ओळख झाली होती. ज्या ईमारतीत आमचे दुकान होते त्याच भागात ती आणि तिची मैत्रीण रहात होत्या. मनातल्या मनात परत प्रेमाचे विचार येत होते पण बोलायचे कसे हा प्रश्न भेडसावत होता. एव्हाना माझ्याकडे मोबाईल फोन आला होता. पण तिचा नंबरच काय नाव देखील माहित नव्हते मला. अचानक आई सोबत बोलता बोलता ती म्हणाली की आम्ही आता ईथून जाणार आहोत. माझी घालमेल सुरु झाली काय करावे हे सुचेना. त्या रात्री झोप काही लागली नाही.  सारखं आपल काही तरी हातातून निसटून नातू असं वाटत होतं. काहीही करुन व्यक्त व्हायला लागणार अस मनाशी ठरवून घेतल.


          आपल्याला बोलता येत नाही पण लिहून व्यक्त होता येईल या विचाराने  मी जमेल त्या ओळी एका वहीच्या  पानावर लिहून काढल्या. 'जीवनाच्या वाटेत अनेक जण येतात काही विसरतात तर काही घर करतात मनात'  खाली नाव आणी नं. लिहिला बस झालं.

ती मी आणि अनुत्तरित प्रश्न || मन हेलावून टाकणारी प्रेम कहानी
ती मी आणि अनुत्तरित प्रश्न || मन हेलावून टाकणारी प्रेम कहानी

          तो कागद आणि पैश्याच्या पाकिटात असलेली काही जुनी नाणी एका भेट कार्डात ठेवून ते खिशात ठेवले. दुसर्या दिवशी सकाळीच ती चहा घेऊन नेहमीप्रमाणे बस स्टॅाप कडे जायला निघाली.  परत भेटेल की नाही या भावनेने मी तिच्या मागे हळू हळू चालत चॊकातील मुख्य बसस्टाॅप जवळ पोहचलो. ति बसमध्ये बसायला पुढे सरसावली, ईकडे माझी हालत बेहाल झाली ह्रद्याचे ठोके प्रचंड वाढले. आता नाही तर कधीच नाही असे ठरवून तिने माझ्याकडे बघताच तिच्या हातात ते पाकिट दिलं. तिने पण कावबावरे होऊन ते घेतल. बस गेली मी तिला काय वाटेल? तीच उत्तर काय असेल? या आधी ती ते वाचेल का अश्या अनेक प्रश्नाने हैराण झालो. हा क्षण मी माझ्या मित्रासोबत शेअर केला.  तो पण भलताच खूश झाला. पण पुढे काय होणार ही चिंता मला सतावत होती. ति पोलिसात तक्रार तर करायची नाही ना? हा पण विचार येऊ लागला. शी! काहीच सुचेना आता तर माझी हालत आधीपेक्षा बेकार झाली.


          बरेच दिवस झाले काहीच उत्तर नव्हते येत. पण मनात मात्र वाटायचे की ती नक्की संपर्क करणार. एके दिवशी संध्याकाळी अचानक मिसकाॅल आला मी उचलायच्या आत कट व्हायचा, असे दोन-तीन वेळा झाले. चॊथ्या वेळेस उचलला तिकडून आवाज आल मी दक्षता बोलतीये मला फोन कर या नंबरवर. क्षणभर मी चक्रावून गेलो. तिचाच फोन होता.  तिला फोन लावला, म्हणाली की घर बदलणे व अभ्यासाच्या व्यापात संपर्क करता नाही आला. जुजबी बोलणे झाले. फोन ठेवून गाडीला किक मारली आणि वेगात जाऊन मित्राला भेटलो त्याला सांगितले. त्या क्षणाला माझ्या ईतका आनंदी माणूस कोणचं नव्हता. त्या रात्रीही झोप लागली नाही. माझ्या डायरीत हा क्षण लिहून ठेवला.


          'उद्या बोलू यात' या शब्दाने माझी उत्सुकता आणखी वाढली. आणि ती वेळ आली आपण कसे चांगले मित्र होऊ शकतो या बद्दल बोलली. मधेच असा विषय निघाला की तिने आपले लग्न आत्याच्याच मुलासोबत ठरले असून शिक्षण पूर्ण व्हायचा अवकाश आहे.


           'चेष्टा' हाच शब्द फोन ठेवल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आला. नियतीने किती क्रूर चेष्टा केली हे असे प्रेम मिळाले नसते तर बरं झालं असत. ती तिच्या आयुष्याबाबत, किंवा भविष्यकाळाचा विचार करुन बसली होती.आणि मी काय करायचे आहे पुढचे भवितव्य काय याचा कधीच विचार न केलेला आंधळा प्रेमी. दररोज फोन होत होते. ईकडचे तिकडचे बोलणे व्हायचे. मला जे हवं होत ते प्रेम परत माझ्यापासून पुन्हा दूर गेल होतं राहिली ती मैत्री. फक्त मैत्री.


          साधारण चार एक महिने चालू होत हे. एके दिवस न रहावून मला तुझ्यासोबत बोलताना ह्रदयात धडधड होते. असच काही टाईप करुन मेसेज पाठवून दिला. दुसर्यादिवशी ती रागवेल या भितीने फोन केलाच नाही. तिचाही काही रिप्लाय आला नाही. न रहावून फोन केला तर  "नंबर अस्तित्वात नाही" अस सांगू लागले. मी कित्येक वेळा फोन लावला पण सगळे व्यर्थ, ती गेली न सांगता न बोलता.


         हे काय करुन बसलो मी असा स्वतः ला खूप दोष देऊ लागलो. प्रेमाच्या भरात चांगली मैत्रीण गमावून बसलो. नैराश्य आल्यासारखे झाले. पार हताश झालो. अपरिचित नंबवरुन फोन आल्यानंतर धाकधूक वाढायची.  "तिचाच तर फोन नाही ना"?  असा प्रश्न यायचा. अधूनमधून अजूनही तशीच अवस्था होते. तिला प्रेमाच्या भानगडीत नव्हते पडायचे तर तिने पहिले पत्र स्वीकारून फोन का केला ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.




लेखन : ✍  सागर यादव . 

सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Khasmarathi 



➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने